Thursday, 31 March 2016

भाजप इज पार्टी विथ नो डीफरन्स....

पार्टी विथ नो डीफरन्स....

आमचाच पक्ष या देशात खूप वेगळा आणि चांगला आहे अशी शेखी भाजप सतत मिरवत राहायचा. या जनतेला ते आवडत होते कारण पक्षात सुशिक्षित आणि हुशार लोक होते. मात्र आता तो समज इतिहास जमा झाल्याचे दिसते. कारण जी बिरुदावली लाऊन भाजप हाकाट्या पिटायचा तोच किती फोल आहे हे मागच्या आठवड्यातील उदाहरणावरून दिसून येईल. ज्या पद्धतीने इतर पक्षात महिलानाचा अपमान करणारे तसेच त्यांचा विनय भंग करणारे महाभाग आहेत तसेच सध्या भाजप मध्ये गणेश पांडे यांचे रूपाने दिसत आहेत.
भाजप ने मागील काही वर्षापूर्वी औरंगाबाद , सातारा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्ते आणि नेते यांनी महिलांची छेड काडली आणि काही ठिकाणी विनयभंग केला त्याविरोधात रान उठवले होते. त्याबद्दल खरे तर त्यांचे कौतुक करायला पाहिजे होते. मात्र आता तेच अनेक ठिकाणी राष्ट्रवादी बरोबर स्पर्धा करताना दिसत आहेत. राजकारण या क्षेत्रात ती असती म्हणजे विविध ठिकाणच्या निवडणुकात असती तर ती समजून घेतली असती मात्र हि स्पर्धा चालू आहे ती राष्ट्रवादी मधील वाईट गुण घेण्याची दिसते. मुंबई येथे पक्षातील सहकारी महिलेचा विनयभंग केला म्हणून सध्या खूप चर्चेत असणारे गणेश पांडे यांचे बद्दल ज्या महिलेचा विनय भंग झाला आहे तिने तक्रार दाखल करून गणेश पांडे याचे अंडरवल्ड बरोबर संबंध असल्याचे सांगितले. गणेश पांडे हे आशिष शेलार यांचे खूप जवळचे असल्याचे बोलले जाते. त्यामुळे इतर पक्षात जसे बेशिस्त आणि लबाड, गुंड नेते आणि कार्यकर्ते होते ते आता भाजप मध्ये सुधा मोठ्या संखेने आहेत त्यामुळे भाजप आता आता आपले स्लोगन बदलणार कि असे वाटते. नवा स्लोगन असा असला तर चांगले होईल "पार्टी विथ नो डीफरन्स" म्हणजे आता तर ते खूप वाचाळ आणि लबाड तसेच दिलेले शब्द पाळणारे नसून उलट दिशाभूल करत असल्याची लोकभावना आहे.
दुसरे एक उदाहरण पाहता येईल ते म्हणजे नागपूर येथे भाजप च्या युवा मोर्च्याच्या नेत्याने म्हणजे सुरजितसिंह ठाकूर याने प्राध्यापक म्हस्के यांना मारहाण तसेच त्यांची गाडी फोडल्याचे बातम्यात पाहिले होते. हा सत्तेचा माज आणि मस्ती इतरांना ५ ते १५ वर्षाच्या काळात आली आणि आता भाजप मध्ये ती फक्त १.५ वर्षाच्या काळात आली हाही बदल यांनी दाखवला. तसेच भाजप चे एक नेते ज्यांची बँकांनी आता त्यांचे संपत्तीवर जप्ती आणली असे बबनराव यांनी खरे तर श्रीगोंदा भागातील विजय मल्ल्या होण्याचा मान मिळवला आहे. त्यांचे जवळपास २७५ कोटी रुपये थकबाकी मुळे कारखाना आणि इतर संपत्ती यावर टाच आणल्याचे वाचण्यात आले. आता मग प्रश्न पडतो कि नक्की भाजप नेमका इतर पक्षांपासून वेगळा कसा. भाजप मधील अश्या वागण्याने राज्यातील लोकांमान्ध्ये तीव्र नाराजी वाढताना दिसत आहे तसेच भाजप नेते आणि मंत्री यांचेविरोधात जनमत तयार होतानाही दिसत आहे.
त्यामुळे आता जे फाटायला लागले आहे ते त्वरित शिवून घ्यावे कारण जर योग्य वेळी त्याला शिलाई नाही केली तर आगामी काळात खूप फाटेल जे नंतर शिवता येणार नाही किंवा वेळ निघून गेलेली असेल...

विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

Friday, 25 March 2016

"मेक इन इंडिया " कशाला मग "मेक इन हिंदुस्थान" का नाही ??

"मेक इन इंडिया " कशाला मग "मेक इन हिंदुस्थान" का नाही ??

आज फेसबुक वर संघ समर्थक लोकांनी केलेली एक पोस्ट पाहिली. पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले होते कि अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना अमेरिकी, जपान मध्ये राहणाऱ्या लोकांना जपानी, चीन मध्ये राहणारे चीनी त्या प्रमाणे हिंदुस्थान मध्ये राहणारे हिंदुस्थानी होते. व्वा काय पण फंडे आणि कसा प्रचार करतात हे लोक आणि स्वतःला राष्ट्रभक्त म्हणवून घेतात आणि या राष्ट्राची धर्म, जाती यावरून शकले कसे करू शकतात हे लोक तेच समजत नाही.

जर हे या देशाला हिंदुस्थान म्हणत असतील तर मग ते मेक इन इंडिया कशाला राबवत आहेत त्या ऐवजी मेक इन हिंदुस्थान का राबविला नाही तसेही आता बहुमतातील आणि संघाच्या रिमोट वर चालणारे सरकार सत्तेत आहेच मग या कार्यक्रमाला सुधा मेक इन हिंदुस्थान नाव द्यायला काय हरकत होती का ??

या पवित्र भूमीचे नाव " भारत " आहे आणि कायम ते भारतच राहिले पाहिजे. याची धर्म आणि जातीच्या नावावर शकले किंवा नामांतर होता कामा नये. जर असा कोणी प्रयंत्न करेल तर तो सच्च्या देश भक्तांनी हाणून पाडला पाहिजे. या भूमीत जे लोक जन्मलेले आहेत तसेच देशाच्या विकास, जडणघडण करण्यात ज्यांनी मोलाचे योगदान दिले आहे त्या प्रत्येक "भारतीयजनाचा" या देशावर आणि साधन संपती वर तितकाच हक्क आहे त्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्या या पवित्र भूमीला कोणत्याही गुलामगिरीत जाऊच द्यायचे नाही मग ती परकीय असेल किंवा स्वकीय असेल.

देशातील सच्चे देशप्रेमी मग ते कोणत्याही धर्माचे किंवा जातीचे असोत यांनी आता संघटीत होऊन खोट्या प्रचाराच्या आधारावर या देशाचे नाव बदलवण्याचा ज्यांनी घाट घातला आहे त्यांना वेळीच आवरतील. तसेच ज्यांनी देशात भेदाभेद सुरु केला आहे अश्या धर्माच्या ठेकेदारांनी सुधा ध्यानात ठेवले पाहिजे तसेच ज्यांना देशाचा खोटा पुळका येतोय त्यांनी सुधा समजून घेतले पाहिजे कि आपल्या देशात राहणाऱ्या प्रत्येकावर प्रेम करा आणि प्रत्येकात मध्ये देश प्रेम जागृत करा कारण बेगडी राष्ट्र प्रेम आणि धर्म प्रेमातून तुम्हाला धार्मिक आणि राजकीय सत्ता यावर कायम पकड मिळवायची आहे हे आता लपून राहिले नाही. म्हणून अश्या प्रचाराला कोणी बळी पडू नका कारण आम्हाला हिंदुस्थान नव्हे तर आम्हाला आमचा " भारत" हाच देश पाहिजे जो आम्हाला प्राण प्रिय आहेच तसेच या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या शहीद, हुतात्मा यांनी बलिदान दिले त्यांचा खर्या अर्थाने सन्मान असेल. म्हणून संघाने या देशात विनाकारण धार्मिक वाद निर्माण करून या देशाला यादवीकडे घेऊन जाऊ नये.

इथला प्रत्येक नागरिक हा देशावर प्रेम करतो आणि देशाची प्रगती तसेच इथल्या प्रत्येक व्यक्तीचा सर्व स्तरातील विकास झाला पाहिजे तसेच प्रत्येक जन माणूस म्हणून जगाला पाहिजे यासाठी आमच्या महापुरुष ज्यांनी न्याय, बंधुता, समता, सन्मान, एकात्मता या गोष्टीवर भर दिला पाहिजे.

आम्हाला भारतीयइजम हवा आहे ना कि धर्म किंवा जाती इजम हवा आहे. तसेच देशातील प्रत्येक नागरिकामध्ये भारतीयत्व आणि भारतजन आम्हाला जागृत करायचा आहे. होय आम्हाला या देशाला महासत्ता झालेले पहायचे आहे आणि तो करण्यासाठी आम्हाला प्रयत्न सुधा करायचे आहेत. या देशाला सर्व क्षेत्रात अग्रसर करायचे आहे आणि त्यासाठी एकसंघ भावना असेल तरच सर्वांचा विकास शक्य आहे. मात्र जर धर्म आणि जाती यावरून जर वक्तव्य तसेच अजेंडे राबवणाऱ्या संघटना आक्रमक झाल्या तसेच सरकार त्यांना जर सहाय्य करणारे किंवा त्यांना पोषक वातावरण निर्माण करून देणारे असेल तर मग कशाची देशात एकता टिकेल आणि देश महासत्ता होईल मग ???

चला जागा करू प्रत्येकातला भारतीय, कायम राहू भारतीय, सन्मान वाढवू भारताचा, महासत्ता करू भारताला, ना करू दलित, मुस्लीम, बहुजन आम्ही सारे होऊ फक्त आणि फक्त भारतीयजन.....

जय भारत...

विजय गोफणे,
९४०४०८०००१

Friday, 18 March 2016

दुष्काळी स्थितीत तरुणाला तारतेय शेळीपालन, शेळीपालन एक शेतीपूरक व्यवसाय :

दुष्काळी स्थितीत तरुणाला तारतेय शेळीपालन, शेळीपालन एक शेतीपूरक व्यवसाय

परिस्थिती माणसाला जगणं शिकवते. नेमके ध्येय ठेवून रस्ता पकडला, कामांची आखणी व कष्ट केले की यश फार लांब राहात नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील हावरगाव येथील अमोल जाधव या तरुणानं ५० शेळ्यांपासून पूरक व्यवसाय सुरू केला. तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थापन करीत २०० पर्यंत त्यांची संख्या वाढवली. आॅनलाइन पद्धतीने मार्केटिंग करीत शंभरपर्यंत शेळ्यांची विक्री केली. दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या जिल्ह्यात चिकाटीने या व्यवसायाला पोल्ट्रीची जोड देत अमोल यांनी आपल्या प्रयोगशीलतेचा नमुना पेश केला आहे..
सुदर्शन सुतार

बार्शी-कळंब रस्त्यावर हासेगावपासून चार किलोमीटरवर आत हावरगाव हे उस्मानाबाद जिल्ह्यातील छोटंसं गाव. तेथील अमोल हा युवक जेमतेम दहावी शिकलेला. आई-वडील, दोन बहिणी असं कुटुंब. वडिलोपार्जित सात एकर शेती, पण पाण्याचा सतत दुष्काळ. विहीर, तीही हंगामी. वडील पारंपरिक शेतकरी. उत्पन्न आणि उत्पादनाचा मेळ कधीच बसला नाही.
ड्रायव्हर ते शेळीपालक अमोल

शेतीची प्रतिकूल स्थिती पाहून कुटुंबाला आर्थिक हातभार लावणे व दोन बहिणींच्या लग्नाची जबाबदारी यातून दहावीनंतरच अमोल पुण्यात खासगी गाडीवर चालक म्हणून नोकरीला लागला. बहिणींची लग्ने कशीबशी उरकली. दोन-तीन वर्षे अशीच काढली. पण पुण्यात मिळणारा पगार आणि खर्च यांचा मेळ काही बसेना. अखेर गावच्या शेतीतच काहीतरी करावं असं त्यानं ठरवलं. काय करावं हा प्रश्‍न होताच. पण शोधणाऱ्याला सगळं सापडतं म्हणतात, तसंच अमोलबाबत झालं.

भाच्याच्या मदतीला आला मामा
केज तालुक्‍यातील युसूफ वडगाव या आपल्या गावी अमोलचे मामा महादेव निकम पोल्ट्री व्यवसाय करतात. साहजिकच अमोल यांनीही मामांना मदत करताना पोल्ट्री व्यवसायात लक्ष घालायला सुरवात केली. मामांनीच मग शेळीपालनाचा मार्ग दाखवला.

पाच लाख गुंतवले
शेळीपालन व्यवसाय अमोलच्या डोक्‍यात चांगलाच घुसला. त्याचा सुरू झाला त्यातील प्रवास.
-व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ६ महिने त्याचा अभ्यास
-पाच दिवसांचे प्रशिक्षण- पुणे येथे
-राज्यातील काही महत्त्वाचे शेळीपालन प्रकल्प अभ्यासले

शेळीपालनास सुरवात
-अद्ययावत बंदिस्त शेळीपालन शेड- १०० बाय ३२ फुटांचे. ठिकाण - हावरगावच्या शेतात.
-सुरवातीला मित्राच्या मदतीने ५० पिलांची खरेदी.
-गेल्या दीड ते पावणेदोन वर्षार्त शेळ्यांची संख्या पोचली- २०० पर्यंत.

मार्केटिंग, विक्री (मुख्यतः पैदासीसाठीच)
-आत्तापर्यंत २०० शेळ्यांची (नर-मादी मिळून) विक्री.
-दर (किलोचे)
शेळी- २५० रुपये (शेळीचे वजन- ४० किलो)
बोकड- २७५ रुपये (बोकडाचे वजन- ५० किलो)

आॅनलाइन विक्री
अमोल यांनी saigoatfarm.com ही वेबसाईट सुरू केली.
त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला.

नव्या पिढीकडे ॲंड्रॉईड मोबाईल व नेट कनेक्शन असल्याने आॅनलाइन पद्धतीच्या विक्रीची त्यांना सर्व माहिती आहे. त्याच आधारे विक्री करणे मला सुलभ झाले.
अमोल जाधव

अमोल म्हणाले
-उस्मानाबादी शेळीचे जातिवंत वाण पैदास करण्यावर भर देणार आहे. मुख्यतः ‘ब्रिडिंग’साठी शेळी पुरवण्याचा मनोदय आहे. त्यादृष्टीने लक्ष केंद्रित केले आहे.
-बाजारात अनेक व्यापारी नगाप्रमाणे शेळी खरेदी करतात. मात्र त्या पद्धतीने आपल्याला शेळीची पुरेपूर किंमत मिळतेच असे नाही. म्हणून वजनावर विक्री हाच मार्ग फायद्याचा. त्यातून शेतकरी व ग्राहक दोघेही संतुष्ट होतात. मी त्यादृष्टीने इलेक्ट्रॉनिक वजन काट्याची व्यवस्थाही केली आहे. .

मी उस्मानाबादी शेळीच का निवडली?
-ती कोणत्याही हवामानात राहू शकते.
-अतिशय काटक आहे.
-वर्षातून दोनदा वेत देते, प्रत्येकवेळी दोन पिले देते. एक शेळी तर चार पिले देणारी आहे.
-मटण चविष्ट असल्यान मागणीही चांगली.

छायाचित्रे
शेडची रचना
-चोहोबाजूंनी जाळी आणि वरती पत्रा.
-शेडचे चार स्वतंत्र भाग
-प्रत्येक भागात चारा आणि पाण्यासाठी स्वतंत्र गव्हाण, त्याद्वारे शेळ्यांना हवा तेव्हा खाद्य आणि पाणी घेता येते. बंदिस्त शेळीपालन असल्याने पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था जागेवरच योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने.
-चारही भागांत फिरण्यासाठी पुरेशी मोकळी जागा

-चारा
हिरवा-
अर्धा एकर
मेथी, तीन वर्षे कटिंग घेण्याजोगी
चारा पीक
-शेळ्यांच्या आवडीचे खाद्य असणाऱ्या शेवरीची बांधावर लागवड

वाळलेला
पावसाळ्यात जास्त उपलब्ध झालेल्या
चाऱ्याचे मूरघासमध्ये रूपांतर
(सायलो)(सुमारे २००० कडबा पेंढीची साठवण)
-
गरजेनुसार बाहेरून खाद्य आणले जाते. मात्र खर्च वाढविण्यापेक्षा शेतातच अधिकाधिक चारानिर्मितीचा प्रयत्न.

पाणी
-सहा बोअर, मात्र एकच चालते
-विहीर
-शेताला
-शेडमध्ये


शेतीवरही लक्ष
शेळीपालनातून मिळू लागलेल्या उत्पन्नामुळे अमोलचा शेतीतील उत्साहदेखील वाढला आहे. यंदा प्रत्येकी एक एकर ज्वारी व गहू, अर्धा एकर कांदा अशी पिके घेतली.

शेळ्यांवर घर चालतं का?
सुरवातीला वडिलांनी विरोध करीत शेळ्यांवर कुठं घर चालतं का? त्यातून आपलं कसं होणार अशी शंका व्यक्त केली. पण शांत वृत्तीच्या अमोल यांनी त्यांना धीर व विश्वासही दिला. कोणत्याही परिस्थितीत मागे हटायचं नाही हे निश्‍चित केलं. अमोल यांच्या पत्नी सौ. ज्योती यांनीही चांगली साथ दिली. सरकारी पशुवैद्यक डॉ. नवनाथ सोनवणे यांचे मार्गदर्शन मिळते. जोडीला अमोल मामांच्या गावी (सुमारे १५ किमी.) ३००० देशी पक्ष्यांचा पोल्ट्री व्यवसायही सांभाळतात. तेथे दर महिन्याला प्रति १००० पक्ष्यांची प्रति तीन महिन्यांची बॅच घेतली जाते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला पक्षी उपलब्ध होतात. किलोला सुमारे १५० रुपये दराने त्यांची विक्री होते.

- संपर्क - अमोल जाधव - ९६५७००३०००.

Tuesday, 15 March 2016

श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा...

आज १६ मार्च रोजी श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर यांची जयंती आहे त्याबद्दल सर्व देशवाशियाना खूप खूप शुभेच्छा.

अनेकांना आपला हा महापराक्रमी योध्दा अद्याप माहित नाही कारण इतिहासाच्या कोणत्याही पुस्तकात ते आपल्याला सापडत नाही. पण कितीही काही झाले तरी आता त्यांचा इतिहास समोर येत आहे आणि त्यांचे ते महापराक्रमी व्यक्तिमत्व माहित होत आहे. या ठिकाणी म्हणून आज त्यांचे कार्याचा थोडासा परिचय द्यावासा वाटतो तसेच त्यांचे महापराक्रम आणि गाजवलेल्या शौर्याला सलाम करावासा वाटतो.

आपल्या देशाचा इतिहास जर पाहिला तर अनेक राजांनी आपल्या देशावर आक्रमण केली तसेच या देशाला लुटले. या देशात सोन्याचे प्रचंड साठे आणि मुबलक साधन संपती असल्याने अनेक राजे जसे कि सिकंदर, अब्दाली इत्यादीसह अनेकांनी देशावर लुटीसाठी आक्रमणे केली. मात्र आपल्या देशातील कोणत्याही राजाने आपल्या देशातील राज्यांना लुटण्याव्यतिरिक्त बाहेर कोणत्याही देशावर आक्रमण किंवा लुट केली नाही.

श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर यांनी मात्र मध्य आशियातील अफगाणिस्थान जिकडे गीलचे आणि पठाण (अब्दाली त्या भागातील होता) यांचे प्रदेशात आक्रमण करून लुट केली होती. यामध्ये आज महाराष्ट्रात एक म्हण प्रचलित आहे " अटकेपार झेंडे रोवणे" ती आहे कोणतेही यश मिळवले कि त्याची तुलना अटकेपार झेंडे रोवले म्हणून केली जाते. अटकेपार झेंडे रोवले ते महापराक्रमी योद्धा श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर यांनीच. या मोहिमेत त्यांचेबरोबर होते तुकोजीराजे होळकर (प्रथम) अटक या शहरात घुसून प्रचंड लुट आणि आक्रमण तसेच शौर्य गाजवले ते यांनीच. हे आक्रमण एवढे रौद्र आणि भयानक होते कि नंतर तिकडे कोणी "मल्हार आया है" असे म्हणाले तरी लोक गावेच्या गावे सोडून जात व भीतीची प्रचंड दहशत निर्माण झाली होती आणि शत्रूला सुद्धा जाम केले होते.

छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहुर्थ मेढ रोवली या महाराष्ट्रात. त्याच महाराष्ट्राच्या कर्तुत्ववान भूमीत फलटण तालुक्यातील होळ मुरूम येथे साध्या मेंढपाळ कुटुंबात जन्म घेतलेल्या आणि ज्यांचे वडील यांचे वय ३ वर्षाचे असताना सोडून गेले होते. या श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर यांनी महान पराक्रम आणि तलवार गाजवून मराठेशाही ची पताका खांद्यावर घेऊन आणि खंडोबाची आराधना करून मराठी साम्र्ज्याची इमारत आणि कळस निर्माण करण्याचे महान कार्य केले तसेच उत्तरेसह संपूर्ण भारतभर मराठी साम्राज्य घेऊन गेले. वयाच्या १५ व्या वर्षापासून हातात तलवार घेऊन लढणारे श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर यांनी वयाच्या ७१ वर्षापर्यंत म्हणजे पूर्ण हयात रणांगणावर घालवली होती. या हजारो लढाया आणि अगणित युद्ध तेही सपाट प्रदेशात " गनिमी काव्याने" लढणारे महान योद्धे होते. गनिमी कावा हा खरे तर सम्राट चंद्र गुप्त मौर्य यांनी शोधला आणि पुढे त्याचा वापर छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर यांनी वापर करून आपले युद्ध कौशल्य धाखावले आणि अनेक योद्धे जिंकली.

आज अश्या या महापराक्रमी राज्याला ज्याची इतिहासाने दखल घेतली नाही त्यांचे शौर्यास आणि कार्यास सलाम तसेच सर्व देश बांधवाना त्यांचे जयंती निमित्य कोटी कोटी शुभेच्छा...आज ज्यांनी इतिहास घडवला त्यांनी जर इतिहास लिहिला असता तर खरा इतिहास आमच्यापुढे आला असता आणि त्याचेपासून प्रेरणा घेऊन नव्या पिढ्या इतिहास घडवायला तयार झाल्या असत्या.........

जय मल्हार.... जय भारत....

विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

Thursday, 10 March 2016

सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांचे राईट टू पी या चळवळीस सलाम

सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांचे राईट टू पी या चळवळीस सलाम

मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख या महिलांचे विशेष हक्क आणि अधिकार यासाठी काम करत आहेत. त्यांची विशेष चळवळ जिचे नाव आहे "राईट टू पी" म्हणजे सार्वजनिक अधिकार. त्या महिलांना सार्वजनिक ठिकाणी युरीनल सेवा मोफत आणि त्या ठिकाणी सुरक्षित वातावरण असावे यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून त्या महिलांचे अधिकार यावर काम करत असताना महिलांचा महत्वाचा प्रश्न म्हणजे सार्वजनिक युरिनल जे आज पैसे घेऊन चालवले जातात तसेच त्या ठिकाणी सुरक्षा, स्वच्छता याबाबी नसतात. तसेच अनेक ठिकाणी तर महिलांना सार्वजनिक किंवा कोणत्याही ठिकाणी युरिनल नसतात. त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते किंवा त्यांचेवर उघड्यावर जाण्याची वेळ येते इथे त्यांचेवर अतिप्रसंग होण्याचे पण शक्यता असते किंवा धोका असतो किंवा तश्या घटना घडल्या आहेत.

मुमताज शेख यांचे विशेष अभिनंदन कारण त्यांनी सुरु केलेली "राईट टू पी" चळवळ याची दखल घेतली गेली ती बीबीसी वर्ल्ड ने. जगातील १०० प्रतिभाशाली महिलांमध्ये मुमताज शेख यांची गणना होते हि महाराष्ट्र तसेच देशासाठी खरच अभिमानाची गोष्ठ आहे. यांचे कार्य जर पाहिले तर यांचे पुढाकारातून मुंबई येथे एका वर्षात ९६ मोफत महिला युरीनल सेवा सुरु झाली आहे. आज मितीला मुंबई मध्ये महिला युरीनल जवळ जवळ ३००० झाली असून त्यामध्ये मुमताज शेख यांचे मुळे खरे तर भर पडली आहे.

बीबीसी वर्ल्ड ने ने त्यांचे कार्याची दखल घेतली आणि त्यांचा गौरव सुद्धा केला तसेच त्यांची निवड हि जगातील ज्या १०० प्रतिभाशाली महिला निवड करण्यात आली त्यामध्ये त्यांची निवड या सामाजिक कार्यातून झाली. म्हणजे तुम्ही समाजातील कोणतीही समस्या घेऊन त्यावर कार्य करा आणि त्याला तडीस घेऊन जाल तर तुमच्या कार्याची नक्कीच दखल घेतली जाईल याची प्रचीती यानिमित्ताने आली आहे.

मित्रानो माणसाचा धर्म कोणता आहे इकडे आपण नेहमीच आपल्या चष्म्यातून पहात आसतो मात्र मानवतेला आणि सामाजिक कार्याला मात्र कोणता धर्म असतो का ? तिथे तर धर्माच्या कोणत्याही भिंती आडव्या येत नाही हेच मुमताज यांचे या कार्यातून समोर येते. महारष्ट्र आणि केंद्र सरकार यांनी महिला समस्या कडे पूर्णपणे लक्ष्य दिले पाहिजे तसेच ते सोडवण्यासाठी निधी तरतूद करून त्यांना योग्य तो न्याय द्यावा.

पुन्हा एकदा मुमताज शेख यांचे कार्यास तसेच त्यांचे "राईट टू पी" या चळवळीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तसेच जाहीर पाठिंबा.

विजय गोफणे, पुणे


९४०४०८०००१

Monday, 7 March 2016

स्त्रियांना माणूस म्हणून समान वागणूक या पुरुषप्रधान संस्कृतीत कधी मिळणार ...

महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा ...

स्त्रियांना माणूस म्हणून समान वागणूक या पुरुषप्रधान संस्कृतीत कधी मिळणार ???

आज जागतिक महिला दिन आहे. या दिवसाचे एकवेगळेपण नक्कीच आहे.
आजचा हा दिवस आहे स्त्रीत्वाच्या उत्सवाचा नि स्त्रीत्वाच्या सर्जनशील अस्तित्वाचा. मानवाने कोरून काढलेल्या विश्वात स्वत:च्या रक्‍ताचे शिंपण करून मानवी मूल्यांची पेरणी करणाऱ्या बाईच्या जातीचा. तिच्याप्रती असलेल्या काहीशा कृतज्ञतेच्या जाणिवेचा; बराचसा अपराधी भावनेचाही! शतकानुशतके दुय्यम मानव म्हणून वागणूक सहन करत आलेल्या स्त्रियांनी हे दुय्यमत्व आता झुगारून दिले आहे. आज त्यांनी अनेक क्षेत्रे आपल्या कर्तुत्वाने पादाक्रांत केलेली आहेत त्या कर्तुत्वाला खरे तर सलाम केला पाहिजे.

आपण आंनी आपली संस्कृती स्त्रियांना सदोदित देवत्व किंवा मातृत्व बहाल करण्याच्या फसव्या बहाण्यानेच स्त्रीत्वाच्या रोकड जाणिवांना पद्धतशीर नख लावण्याचा काम करत आले आहे. "स्त्री ही क्षणकालाची पत्नी आणि अनंतकाळाची माता असते‘ हे टाळीचे वाक्‍य विशिष्ट संदर्भात सुविचारासारखे ठरते. परंतु, व्यवहारात मात्र त्याला कुठल्या तागडीत तोलायचे, हा प्रश्‍न कुठल्याही सुजाण नागरिकाला पडल्याशिवाय राहत नाही.

स्त्री "ही अनंतकाळाची माणूस असते‘ हे त्यातच दडलेले रोकडे सत्य आपल्याला आणखी किती पिढ्या खर्ची पडल्यानंतर ऐकू येऊ लागणार आहे, हे कोडेच आहे. आपण "महिला दिना‘च्या सोहळ्यात दिवस मावळेपर्यंत अगदी उत्साहाने सामील होऊ तसेच जोरदार भाषणे सुद्धा करू आणि महिला सबलीकरण यावर आपले मतही प्रभावीपणे मांडू, यात दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता, काहीही शंका नाही. पण प्रश्न आहे तो इतर 364 दिवसांत आपण कसे वागणार, हाच...

सर्वांना विनंती आहे कि वर्षातील प्रत्येक दिवस हा महिला सन्मान दिवस आहे असे मानून आपल्या माता, भगिनी , पत्नी तसेच समाजातील इतर स्त्रिया यांना केवळ स्त्री म्हणून न पाहता एक माणूस म्हणून पहा आणि त्यांना समानतेने आणि सन्मानाने वागवा याच शुभेच्छा आणि सदभावना राहील महिलांप्रती..

जय भारत
विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

Friday, 4 March 2016

चला १ एप्रिल साजरा करूयात "फुल्ल भोजन दिवस " ...

चला १ एप्रिल साजरा करूयात "फुल्ल भोजन दिवस " ...
मित्रानो आपल्याकडे १ एप्रिल म्हणजे एकमेकाला फसवण्याचा दिवस (एप्रिल फुल) म्हणून साजरा केला जातो किंवा तसे मानले जाते. तसे पाहिले तर वर्षातील ३६५ दिवस हा फसवणुकीचा कार्यक्रम आणि दिवस चालूच असतो त्यासाठी कोणालाही मुहुर्थ किंवा याच तारखेला फसवले पाहिजे असे काही नसतेच. तरीही आपल्याकडे सगळे साजरा करतात म्हणून १ एप्रिल रोजी कोणीही कोणालाही खासकरून जो परिचयाचा असतो त्याला फुल करत असतो.
असो मुद्दा हा आहे कि आम्ही ठरवले आहे कि १ एप्रिल हा " एप्रिल फुल " असा दिवस न करता जे अनाथ किंवा गरीब आहेत ज्यांना १ वेळेची जेवायची भ्रांत पडली आहे त्यांना एक वेळचे " फुल्ल " जेवण द्यायचे जे आपण आपल्या घरी जेवतो. म्हणून या दिवसाला मित्रानो आम्ही " फुल्ल भोजन दिवस " असा दिवस म्हणून साजरा करायचा ठरवले आहे.
यामध्ये नेमके असे करायचे आहे कि त्या दिवशी आपल्या घरातील एकवेळचे जे जेवण तयार करू त्यामध्ये १ व्यक्तीचे जास्तीचे जेवण तयार करायचे. ते जेवण आपल्या भागातील जे अनाथ असतील, ज्यांना जेवणं मिळत नाही असे गरीब असतील, जे शासकीय दवाखान्यात दाखल झालेत पण १ वेळचे महागडे जेवण घ्यायला पैसे नाहीत त्यांना जेवण देणे किंवा जे कोणी गरजू असतील अश्या आपल्या देश बांधवाना त्या दिवशी जेवण द्यायचे कार्य आपण करूयात.
मित्रानो १ एप्रिल या दिवशी आपण कोणालाही फसवणार किंवा फुल करणार नाही तर एक सामाजिक जबादारी म्हणून एक दिवस किमान एक वेळचे गरजूंना जेवण देऊन सामाजिक उत्तरदायित्व दिवस म्हणून साजरा करू शकतो.
ज्यांना या दिवशी गरजूंना जेवण द्यायची इच्छा असेल , किंवा या उपक्रमात तसेच आमच्या टीम मध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी कृपया खालील नाव आणि नंबर यावर संपर्क साधावा तसेच हि संकल्पना आवडली तर watsaap, twitter, facebook, तसेच इतर मेडिया पर्यंत हा मेसेज पोहचवाल आणि हि चळवळ मोठ्या प्रमाणात राबवण्यास सहकार्य कराल हीच अपेक्षा आणि आपणास विनंती कि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवा.
( सर्व ग्रुपपर्यंत हि माहिती पोहचवा आणि सहभागी व्हा
यासाठी ‪#‎१एप्रिलभोजनदिवस‬-विजय गोफणे९४०४०८०००१ हि लिंक शेयर करा,
तसेच आपल्या भागात सुद्धा साजरा करा दिवस)
जय भारत
विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१ (संपर्क

Thursday, 3 March 2016

कोणत्याही टोकाच्या विचारसरणी देशाला घातकच

कोणत्याही टोकाच्या विचारसरणी देशाला घातकच ......

देशामध्ये अनेक विचारसरणी आहेत आजमितीला. अतिशय चांगली गोष्ठ आहे हि कि विचार करण्याची किंवा बुद्धीचा वापर ( विचारसरणीला बुद्धीची गरज असते) करण्याची मुभा आहे. मुळात ज्या अनेक विचारसरणी ज्यांचे नावाने असतील जसे कि मार्क्स , लेनिन, फुलेवाद, आंबेडकरवाद, पेरीयारवाद, संघवाद , डाव्या , उजव्या इत्यादी अनेक विचारसरणी आहेत. मात्र कोणतीही विचारसरणी हि शाश्वत नसत तर कालानुरूप तिच्यामध्ये काही बदल होतात किंवा त्यामध्ये आणखी माहिती सामाविस्ट करावी लागते.

जिच्या मध्ये असे बदल घडत नाहीत किंवा बदलास सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत त्या विचारसरणी पाठीमागे पडतात. त्यामुळे फक्त तेच विचार किंवा तत्वज्ञान अगदी बरोबर आहे आणि नवीन चुकीचे आहे म्हणून टोकदार वागणे किंवा त्या विचारसरणीचा टोकाचा प्रचार आणि प्रसार करणे हे देशासाठी नक्कीच घातक आहे. आपल्या देशात नेमके तेच घडत आहे असे वाटते कारण प्रत्येक जन नाव त्या विचारसरणी असलेल्या नेत्याचे घेतो आहे आणि अगदी टोकाची रेटा रेटी चालू आहे. यामध्ये संघ आघाडीवर होता आता त्याचे जोडीला डाव्या संघटना आणि इतर विचारसरणी टोकाचे विचार आणि प्रतिक्रिया देताना दिसतात. देशातील वातावरण यामुळे बदलत असून अनेक संघटना आणि संस्था या सध्याच्या सरकार विरोधात दंड थोपटून उभ्या आहेत. या साठी सरकार सुद्धा तेवढेच जबाबदार आहे.

कारण नसताना अनेक ठिकाणी सरकार हस्तक्षेप करत आहे जसे कि जेएनयु असेल , किंवा एफटीआई, हैद्राबाद इत्यादी ठिकाणी जास्तच हस्तक्षेप आणि तानातानी झालेली आहे. त्यामुळे मृत अवस्थेत चाललेले विरोधी पक्ष, संघटना तसेच देशाला घातक असणाऱ्या शक्ती यांना पोषक आणि पूरक वातावरण आयतेच सरकार ने निर्माण करून दिले आहे. मुळात अनेक देशात क्रांती झाल्या त्या क्रांतीचे शिलेदार किंवा विचारप्रणालीचे निर्माते यांनी त्याकाळात आवश्यक त्या विचारसरणी तयार केल्या. मात्र आमचे बरेच लोक त्यांचे चळवळी, आंदोलने किंवा तत्वज्ञान पाहून आले आणि आपल्या देशात जसेच्या तसे वापरू पहात आहेत. मुळात आपल्या देशात सुद्धा चांगले विचारवंत किंवा तत्वज्ञान तसेच चळवळ साठी पूरक विचार निर्माण करून गेलेले महापुरुष आहेत पण आमची मानसिक गुलामी काही केल्या संपत नाही हे यावरून दिसून येते. आमचेकडे सुद्धा अनेक विचारवंत आणि तत्वज्ञ होऊन गेले यांचे विचार किंवा तत्वज्ञान यावर काम करणाऱ्या संघटना का नाहीत.

देशात होऊन गेलेले अनेक संत , तत्वज्ञ जसे कि फुले , पेरियार, आंबेडकर, शाहू सह अनेकांनी अतिशय चांगले , उपयुक्त आणि देशी तत्वज्ञान दिलेले असताना तसेच या संत आणि तत्वज्ञानी लोकांना इथल्या समाजाने बहिष्कृत, किंवा छळ, किंवा कपटाने मारले असताना आणि चांगले तत्वज्ञान दिलेले असताना आम्हाला ते का नको आहे आणि परदेशी का हवे आहे आणि तेही टोकाचे का हवे आहे तेच कळायला मार्ग नाही. काही कालखंड असतो ज्या काळात काही विचारसरणीला पोषक वातावरण निर्माण होते कारण त्याला सहाय्यभूत सरकार येते त्यावेळी ती विचारसरणी वाढते किंवा त्या विचारसरणीला मानणारे सरकार अतिरेक करू लागले तर त्या विचारसरणी विरोधात उठाव होऊ लागतो ज्यामुळे सरकार आणि त्या विचारसरणीला ब्रेक लागतो.

त्यामुळे अनेक विचारसरणी असल्या पाहिजेत पण टोकाच्या जरूर नसाव्यात.
ज्यामुळे देश्याबाहेरून देशाच्या विरोधात काम करणाऱ्या तसेच देश विघटन करू इच्छिणार्या शक्तींना बळ येऊन त्या त्यांचे इच्छित कार्य देशात करू शकतील. त्यामुळे वैचारिक वाद आणि संवाद देशात चालू राहतील पण ते टोकाचे नसावेत जेणेकरून बाह्य शक्ती याचा फायदा घेऊन देशात अस्थिर वातावरण किंवा देशाचे नुकसान करतील.

देशाला आता गरज आहे एका नव्या विचारसरणी , तत्वज्ञान यांची ज्यामुळे देश हा सर्वांना आपला वाटेल आणि ज्यामध्ये सर्वांचा विकास, सर्वांचे भले आणि कल्याण , समता , ज्ञाय, बंधुता , राष्ट्रप्रेम इत्यादी मुल्यांचा अंगीकार केला पाहिजे.

( गरज आहे भारतीयवाद किंवा बहुजन नव्हे तर भारतजन म्हणायचे वेळ आली
आहे असे वाटते)


जय भारत